सर्वांना ही दीपावली, येणारं नवीन वर्ष आणि सर्व आयुष्यात, सुख, समाधान, यश, आनंद लाभो, या शुभेच्छा! – अशी माझी ‘शुभ दीपावली’ची शुभेच्छा!
या शुभेच्छा व्यक्त करतानाची माझी भावना आहे, की एका अत्यंत धोकादायक कालखंडातली ही दीपावली आहे. एका अत्यंत धोकादायक कालखंडाच्या सावलीत ‘शुभ दीपावली’ या शुभेच्छा, ही प्रार्थना मी व्यक्त करतो आहे.
आपल्या भारतीय संकल्पनांमध्ये कमालीचा सखोल अर्थ आणि त्यामुळं त्यात विलक्षण सौंदर्य भरलेलं आहे. मी ‘सौंदर्य’ हा शब्द वापरतो आहे. दीपावलीच्या शुभेच्छासुद्धा व्यक्त करायच्या झाल्या तर त्या आहेत ‘शुभ’ दीपावली. अलीकडं पाश्चात्त्यीकरण, त्यातले ‘इंग्रजाळलेले’, भाषेचं, जाणिवांचं आणि त्यामुळं संस्कृतीचं ‘इंग्रजीकरण’ करणारे आणि त्यापायी आपलं ‘आत्मभान (self-awareness)’ हरवलेले, आपण कोण, आपण कोणत्या मातीत रुजलेलो आहोत, आपली आई कोण, आपण कुठून उगवून आलो या सगळ्याचा जणू विसर पडल्यासारखं आपण जोरजोरात ‘हॅपी दिवाली’ म्हणतो!
‘हॅपी’ दिवाली! गोष्ट आनंदाचीच आहे, की दीपावली आनंदमय जावो. पण अर्थ आणि त्यामागची भावना, विचार समजल्यामुळं आता अनेक वर्षं मी संज्ञा वापरतो – ‘शुभ’ दीपावली! हा शब्द विलक्षण अर्थपूर्ण आहे. कारण ही दिवाळी ‘आनंदी (हॅपी)’ तर असोच; पण खरा आनंद कशात आहे? कुणाला जर वाटलं ‘हॅपी’ दिवाली म्हणजे सिगरेट–दारू–तंबाखू आणि ‘हॅपी दिवाली’ म्हणजे बदललेल्या काळात फटाक्यांमुळं होणारं प्रदूषण. (की जे ‘भारतीय मन’ लक्षात घेतं. भांडायला, खून–खराबा करायला उठत नाही. आपणहून मान्य करून ठरवतं की बदललेला काळ, पर्यावरणाची समस्या पाहता आपण फटाक्यांवर खर्च तरी करायला नको किंवा तो कमी करूया. हा आतून येणारा बदल आहे.) म्हणून ती ‘हॅपी दिवाली’ तर आहेच; पण ती ‘शुभ दीपावली’ आहे.
भविष्यात आपल्याशी भारतीय संकल्पना आणि त्यांचा अर्थ यांवर संवाद करताना कधीतरी अर्थशास्त्र या विषयावर सविस्तर बोलेन. मात्र दीपावलीच्या प्रकाशात आज फक्त ‘शुभ लाभ’ ही संज्ञा सांगतोय.
पाडव्याच्या दिवशी, बलिप्रतिपदेला नवसंवत सुरू होतं. या दिवशी आपला व्यापारीवर्ग आपल्या व्यापाराच्या वह्या–पुस्तकांची पूजा करतो. व्यवसाय सात्विक भावनेनं करायचा आहे, हे त्यामागचं अर्थपूर्ण पावित्र्य. ज्यात मी हिशोब ठेवतो तेच माझे सात्विक, पवित्र धर्मग्रंथ आहेत. या दिवशी व्यापारीबंधू त्या वहीवर स्वस्तिक काढतो आणि ओल्या कुंकवात खाली शब्द लिहितो – शुभ लाभ!
हा फार महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण शब्द आहे. अर्थशास्त्रात नफा कमावणं (profit maximization) हा हेतू सांगितला जातो. कोणत्याही व्यवसायात हा नफा वाढत गेला पाहिजे. माझ्या मते, हे अर्थशास्त्र अॅडम स्मिथपासून, जॉन मार्शल लॉर्ड केन्स, मिल्टन फ्रीडमन आणि कालपर्यंत ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं यांनी मांडलेलं पाश्चिमात्त्य अर्थशास्त्र आहे. हा नफा कमावत असताना मी कुणाचं शोषण करतो आहे का, कुणाचं नुकसान होत आहे का, अलीकडच्या काळाबद्दल बोलायचं झाल्यास व्यापारातून भरमसाठ नफा कमावताना त्याची किंमत पर्यावरण चुकती करत आहे का? हा नफा आहे; मात्र तो ‘शुभ लाभ’ नाही. व्यवसाय चालवायचा असेल तर ‘लाभ’ म्हणजे नफा हवाच. मात्र तो दुसर्याला लुटून, त्याचं शोषण करून, खोटं बोलून, फसवून नाही. व्यापार करणं किंवा जीवन जगणं ही win win situation असायला हवी. ग्राहक म्हणून मी तुला वस्तू किंवा सेवा दिली, त्यातून तुझं आणि माझंही घर चालायला हवं. म्हणून त्या व्यवसायातून नफा म्हणजे लाभ आवश्यक आहे; पण तो ‘शुभ लाभ’ असायला हवा. तशी दीपावलीची ही शुभेच्छा – ‘शुभ’ दीपावली!
मला हे म्हणायला आवडतं, कारण ती माझ्या हृदयातली खरीखुरी भावना आहे की मुळातच – सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा! या अवस्थेत मी मुख्यतः जगतो. अशा ‘सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा’ कायमच्याच आहेत; मात्र दिवाळी हे त्या व्यक्त करण्याचं एक चांगलं निमित्त. म्हणून ‘शुभ दीपावली’. आपल्या सर्वांना सुख, समाधान, यश, आनंद लाभो. येणारं नवं संवत, आपलं जीवन सुख, समाधान आणि आनंदानं भरून जावं. आपल्यातून समाज, देश, विश्व आणि निसर्गसुद्धा सुख, समाधान आणि आनंदानं भरला, भारला जावो.
॥ २ ॥
तरीही हे म्हणत असताना, माझ्या मनात एक लख्ख, जिवंत भान आहे, की आपण एका अत्यंत धोकादायक कालखंडात आहोत. तुमच्या माझ्या वैयक्तिक आयुष्यापासून ते महाराष्ट्र, भारत आणि जग एका अत्यंत धोकादायक कालखंडातून जात आहे.
‘नेमेचि येतो मग पावसाळा’प्रमाणे लोकशाही पद्धतीत ठराविक काळानं निवडणुका होतात. तशा आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आहेत. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ जाणलेले संत पुढं सांगतात – ‘हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’. पावसाळा दरवर्षी येत असला तरी तो कंटाळवाणा, दरवर्षीच्या वेळापत्रकातला नाही. उलट सृष्टी ज्या तर्हेनं काम करते, तिचं हे कौतुक आहे. तसं लोकशाहीचंही कौतुक म्हणजे निवडणूक. महाराष्ट्राची ती येऊ घातली आहे. मात्र धोक्यांचा उल्लेख करताना मी फक्त निवडणुकांबद्दल बोलतोय असं नाही. अटलजी म्हणाले होते तसं, निवडणुका येतील आणि जातील, सरकारं येतील आणि जातील, मात्र देश या सर्वांच्या वर असून तो चालला पाहिजे. मी म्हणत असलेला धोकादायक कालखंड हा देश चालवण्याच्या दृष्टीनं आहे.
माझं हे वैयक्तिक दुःख आहे, की ज्या महाराष्ट्राचं काम आहे देशासाठी काम करणं, लढणं, जीवनाच्या सर्व क्षेत्रांत प्रतिभेचा आविष्कार घडवणं, देशप्रश्नांवर मूलभूत अभ्यास करून त्यावर स्वतंत्र बुद्धीनं उपाय शोधणं; त्या महाराष्ट्राच्या समकालीन चित्राकडं, संस्कृतीकडं, सार्वजनिक जीवनाकडं बघताना हृदयाला हजारो इंगळ्या डसतात आणि प्रश्न पडतो की महाराष्ट्राला झालंय तरी काय! म्हणून हा धोकादायक कालखंड आहे.
सध्या भारत देशही स्वातंत्र्यानंतरच्या एका अत्यंत धोकादायक कालखंडातून जातो आहे. स्वतंत्र भारताच्या वाटचालीचा अभ्यास करताना आणि कार्यकर्ता म्हणून काम करताना आतापर्यंत मला वाटत आलं आहे की स्वतंत्र भारताच्या वाटचालीतलं सर्वात धोकादायक दशक १९८० चं दशक आहे. या दशकात ‘कार्यकर्ता’ म्हणून मी काम करत होतो. या कामानं दिलेल्या दृष्टीतून पुढं अभ्यास करून आयएएस झालो. या दशकात आपल्या देशाची अर्थव्यवस्था अजूनही मागासलेली होती. आपल्या आर्थिक विकासाचा दर शरम वाटेल इतका कमी होता. आर्थिक धोरणं फसत होती. लोकसंख्या वाढत होती. लोकांच्या आशा–आकांक्षा–अपेक्षा वाढत होत्या. त्यांना आर्थिक विकास, त्याची गती पुरी पडत नव्हती. त्याचवेळी देशाच्या विविध कानाकोपर्यात फुटीरतावादी चळवळी डोकं वर काढत होत्या. बहुसंख्य फुटीरतावादी चळवळी दहशतवाद आणि हिंसेच्या मार्गानं चालल्या होत्या. आता हा देश तुटतो की काय, असं चित्र निर्माण झालं होतं.
याच दशकात जम्मू–काश्मीरमध्ये दहशतवादानं डोकं वर काढायला सुरुवात केली होती. दहशतवादी संघटना तयार होऊन त्यांचा बेदरकारपणा वाढत होता. या संघटनांना पाकिस्तानसहित अनेक भारतविरोधी शक्तींचा पाठिंबा होता. पंजाबमध्ये खालिस्तानची मागणी होऊ लागली. शीख संप्रदायाचा इतिहास भारत, भारतीय संस्कृतीसाठी, तिच्या संवर्धनासाठी लढण्याचा इतिहास असताना त्यातल्या काहींचं डोकं फिरलं, फिरवण्यात आलं की आम्ही वेगळे, सबब आम्हाला भारतापासून फुटून निघायचं आहे, नाहीतर आम्ही ‘भारतीयांच्या’ कत्तली करू. मुळातला हसरा खेळता पंजाब, प्रचंड उत्साही पंजाब, आनंदी पंजाब, नाचणारा पंजाब, रंगीबेरंगी पंजाब, हिरवागार पंजाब, कष्टाळू पंजाब, तगडा पंजाब, खेळाडू पंजाब, भांगडा खेळणारा पंजाब बघता बघता सूर्यास्ताला स्मशानात रूपांतरित झालेला आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करत असताना डोळ्यानं पाहिला.
भारताचा ‘पूर्वांचल’ आपापल्या कारणांमुळं खदखदत होता. आसाममध्ये बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांची समस्या त्या काळात पेटली आणि त्यातून एक जन आंदोलन उभं राहिलं. ते जन आंदोलन शांततामय होतं. मात्र काही देशद्रोही, फुटीरतावादी शक्तींनी या आंदोलनाचा वापर करून आसामला भारतापासून वेगळं करण्यासाठी ‘उल्फा’ नावाची दहशतवादी संघटना स्थापन करून खून खराबा सुरू केला. याही संघटनेला बांगलादेशातील काही शक्ती, चीन, पाकिस्तान यांच्या पाठिंब्यासहीत त्याला जागतिक शीतयुद्धाची चौकट होती. मॅकमोहन रेषा चीननं मान्य न केल्यामुळं अरुणाचल सततचा धगधगत असायचा. नागालँडमध्ये वेगळ्या राष्ट्राच्या मागणीला तर १६ ऑगस्ट १९४७ पासूनच सुरुवात झाली होती. बघता बघता ती सशस्त्र चळवळीत रूपांतरित झाली होती. तिला आधी पूर्व पाकिस्तान आणि नंतर बांगलादेश, चीन, शीतयुद्धकालीन राजकारणातली अमेरिका, त्यामुळं सीआयए आणि त्या भागात वावरणारे ख्रिश्चन मिशनरी या सगळ्यांची फूस होती. त्यातून वेगळ्या नागालँडची मागणी आणि त्यासाठी सशस्त्र लढा उभा राहिला होता. दुर्दैवानं मणिपूरमध्येही तेच. मिझोरम तेच.
अचानक आता पुन्हा दिसणं सुरू झालंय की या सगळ्या समस्या पुन्हा एकदा डोकं वर काढत आहेत. त्यांची एकमेकांशी मिलीभगत आहे. आतापर्यंत सुप्त वाटलेल्या अन्य फुटीरतावादी, भयानक हिंसक शक्यता आता डोकं वर काढत आहेत. म्हणून मला असं वाटतं की १९८० च्या दशकासारख्या भयानक कालखंडात आपण पुन्हा एकदा आहोत.
काश्मीरमध्ये कलम ३७० तर रद्द झालं. त्यानुसार नव्यानं निवडणुका झाल्या. लोकशाही प्रक्रिया पार पडली. मात्र देशद्रोही आणि फुटीरतावादी शक्ती तिथं खदखदत आहेतच. काश्मीरमधल्या निवडणुकांद्वारा दहशतवादी शक्ती विधानसभेत येणार की काय याची शंका बाळगायला जागा आहे. पंजाबमध्ये पुन्हा एकदा खालिस्तानी चळवळ डोकं वर काढू पाहत आहे. खालिस्तानी चळवळीला जनमानसातून आधार नसला तरी यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतून निवडून आलेले दोन खासदार खुल्लमखुल्ला ‘खालिस्तान’वादी आहेत. त्यातला एक अमृत पाल सिंग तर तुरुंगात आहे. तरी त्यानं निवडणूक लढवली आणि तो निवडून आला. देश फोडण्याची भाषा करणारे निवडून येत असतील तर दिसून येतं की त्यांना निदान त्यांच्या मतदारसंघात जनाधार आहे. ही धोक्याची गोष्ट आहे. लोकसभेत खासदार म्हणून निवडले गेल्यानंतर लोकप्रतिनिधींना देशाच्या एकात्मतेची, अखंडतेची आणि संविधानाच्या रक्षणाची शपथ घ्यायची असते. तरीही ज्यांना खालिस्तान हवा आहे, असे दोघं संसदेत आहेत. या शक्तींना पाकिस्तानचा पाठिंबा आहे.
वेगळ्या खालिस्तानच्या मागणीला कॅनडाचा पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यानं पाठिंबा दिला आहे. खालिस्तानची मागणी करणार्या राजकीय पक्षासोबत परवापर्यंत तो सत्तेत होता. आता त्यानं तो पाठिंबा काढून घेतला असला तरी आपलं सरकार पडणार नाही याची काळजी घेतली आहे. कॅनडात खुल्लम खुल्ला वेगळ्या खालिस्तानच्या मागणीला पाठिंबा आहे. गेल्या वर्षी कॅनडातल्या कोलंबिया प्रांतातल्या सरे या ठिकाणच्या गुरुद्वारात हरदीप सिंग निज्जरची हत्या झाली. तर कॅनडाचा पंतप्रधान म्हणतो, ही हत्या भारतानं करवली. सध्या भारत–कॅनडा संबंध पूर्वी कधीही नव्हते, इतके जास्त तणावपूर्ण आहेत. अर्थात कॅनडा हे त्याच्या स्वतंत्र बुद्धीतून हे करत नसून त्याच्या खांद्यावरून अमेरिकेनं भारतावर रोखलेली ही बंदूक आहे. अमेरिकेत राष्ट्रपती निवडणूक येऊ घातली आहे. अमेरिकेच्या स्वतःच्या राजकीय अपरिहार्यता आहेत. अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक पक्षाचं राजकारण ढोबळमानानं भारतविरोधी आणि त्यात मोदी–भाजपविरोधी आहे. भारतानं दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या गुरुपतवंत सिंग पन्नूला अमेरिका संरक्षण देते. तो पन्नू ‘आये दिन सौ बार’ भारताविरोधात बोलत राहतो. आतासुद्धा तो म्हणतो की
१ ते १९ नोव्हेंबर या कालावधीदरम्यान तुम्ही एअर इंडियाच्या विमानानं जाऊ नका; कारण आम्ही ती विमानं उडवून देणार आहोत. ही म्हणे अमेरिकेची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या आहे! आता अमेरिका आपल्यावर आरोप करते की भारताचा कुणी निखिल गुप्ता किंवा विकास यादव जो पूर्वी RAW मध्ये होता त्याने या पन्नूच्या हत्येचा कट रचला.
हे सर्व आंतरराष्ट्रीय राजकारणातले पेच आहेत. अत्यंत निर्दयपणे हे राजकारण चालतं. भारतावर अनेक कारणांनी दबाव आणणं हा त्याचा उद्देश आहे. अमेरिकेला एका बाजूला चीनसमोर सक्षमपणे उभी राहू शकेल अशी शक्ती म्हणून भारत हवा आहे आणि त्याचबरोबर स्वतःच्या ताकदीवर भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून उभा राहील, हे अमेरिकेला खपत नाही. अमेरिकेला जणू भारत तिच्या ताटाखालचं मांजर बनायला हवं आहे. तिकडं विस्तारवादी आक्रमक चीन आहेच. अरुणाचलवर आजही दावा करतच आहे. पाकिस्तानला पाठिंबा देत भारतविरोधी कारवायांना पाठबळ देतच आहे. लडाखमध्ये गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष जरासा थांबून दोन देशांमध्ये सीमारेषेवर गस्त घालण्याचा निर्णय झाला असला तरी धोका कायम आहे. चालू असलेलं रशिया–युक्रेन युद्ध. आता त्या युद्धात उत्तर कोरियानं आपलं स्वतःचं सैन्य पाठवलं. नाटो किंवा ईयूचं सदस्यत्व द्या अशी युक्रेनची मागणी आहे. या युद्धात आम्ही अणुबॉम्बचा वापर करू अशी धमकी पुतीन यांच्या रूपात एका देशाचा राष्ट्राध्यक्ष धमकी देतो. हे धोके कमी म्हणून की काय, ७ ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायल हमास युद्ध सुरू झालं. जाणार्या दिवसागणिक या युद्धाची व्याप्तीदेखील वाढतच आहे. हमास, हिजबुल्ला यांच्या पाठीशी मुख्यतः इराण आहे. येमेनमधल्या हौथी या शियापंथीय संघटनेला इराणचा पाठिंबा आहे. ही संघटना इराणचं आखात किंवा लाल समुद्र यात चाचेगिरी करत व्यापाराला बाधा निर्माण करते. जगाचा फार मोठ्या प्रमाणावरचा तेलाचा व्यापार या भागातून चालतो. यातून इस्रायल–इराण युद्ध पेटण्याच्या शक्यता आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन इस्रायलला धमकी देतात, की तुम्ही इराणच्या अण्वस्त्रांना हात लावला तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ! अमेरिका इस्रायलला सांगते (किंवा सांगितल्याचं नाटक करते) की इराणच्या तेल विहिरींना काही करू नका. अशावेळी तैवानवर आक्रमण करून तो ताब्यात घेण्याची तयारी चीन करत असल्याच्या शक्यता दिसतात. दोन दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या सेनेची पाहणी केली. त्यांनी केलेलं विधान आहे – युद्धासाठी तयार राहा! एका राष्ट्राध्यक्षानं केलेलं हे विधान वरवरच आहे असं मानून चालणार नाही. शी जिनपिंग कोणत्या युद्धाकडं बोट दाखवत आहेत? अशी सर्व जगाची कमालीची काळजीची स्थिती आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचे सेक्रेटरी जनरल अँटेनियो गुटेरेस काही दिवसांपूर्वी म्हणाले, the world is one mistake away from nuclear holocaust! संभाव्य अण्वस्त्र हल्ला आणि त्यातून होणार्या उद्ध्वस्ततेपासून जग एका चुकीच्या अंतरावर आहे. कुणीतरी कुठेतरी दाबलेलं चुकीचं एक बटण जगामध्ये भडका उडवून देऊ शकेल.
तेव्हा महाराष्ट्र, भारत, जग एका अत्यंत धोकादायक कालखंडातून जात आहे. त्यात मला जाणवतं की भारताचा सध्याचा काळ १९८० प्रमाणे धोक्याचा आहे. या सर्व धोकादायक शक्यतांना बळ देणार्या देशांतर्गत शक्ती आहेत. नक्षलवाद आणि इस्लामिक दहशतवाद या दोघांची एकमेकांशी मिलीभगत आहे. अवघ्या तीन दिवसांमध्ये शंभरपेक्षा जास्त विमानांना बॉम्ब ठेवल्याचे संदेश आले. एकाही विमानात असा बॉम्ब नसला तरी त्यातून उडणारा गोंधळ, विमानं रद्द होणं, उड्डाणांना विलंब होणं आणि भारतात गोंधळ उडवून देण्याची ही योजना आहे. रेल्वेचे मुद्दाम अपघात घडवून आणण्याचे देशभरात प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतं. रूळ जोडणारे नटबोल्ट काढा, रुळांवर मोठे दगड ठेवून रेल्वे घसरवण्यासाठीचे प्रयत्न होताना दिसतात. रेल्वेच्या कामासाठी लागणार्या डायनामाइट गोडाऊनमध्ये काम करणार्या रेल्वे कर्मचार्यानं ते डायनामाइट रेल्वे उडवून देण्यासाठी रुळावर लावलं. आपली ड्युटी संपवून घरी जाणार्या एका कर्मचार्याला ते दिसलं. येणार्या रेल्वेच्या दिशेनं हातवारे करत तो पळत सुटला. रेल्वेच्या लोको पायलटला ते दिसलं आणि त्यानं रेल्वेला नीट ब्रेक लावला. तामिळनाडूमध्ये मात्र असा रेल्वे अपघात टळू शकला नाही. म्हणून देशांतर्गत घातपात घडवून आणू इच्छिणार्या अनेक शक्ती काम करत आहेत. आपल्याला भारत देश आणि भारतीय नागरिक या नात्यानं सावध राहत, प्रार्थना करत आणि आपल्या परीनं काम करत हे चित्र पालटवून विकसित भारताच्या दिशेनं, ‘विश्वमित्र’ असलेल्या भारताच्या दिशेनं आपल्याला वाटचाल करायची आहे. त्यासाठी आणि कायमच,
सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा!
आणि, शुभ दीपावली!
Post a comment Cancel reply
Related Posts
चाणक्य मंडल परिवार आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा
विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात येत आहे चाणक्य मंडल परिवार…
शपथविधी देखणा, खरी आव्हानं आता सुरू… ( जानेवारी 2025 )
विधानसभा निवडणूक निकालांनंतर दोन आठवड्यांनी महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी अखेर पार पडला. शपथविधीचा सोहळा देखणा…
UPSC Interview Guidance Program 2024-25
India’s Most TrustedChanakya Mandal Pariwar’sUPSC Interview Guidance Program 2024-25 One to One Mock with Dharmadhikari…
महाराष्ट्राचा कौल: भारतासाठी ( डिसेंबर 2024 )
शनिवार, २३ नोव्हेंबरची माध्यान्ह उलटून चालली आहे. संपूर्ण देशाचं आणि काही प्रमाणात जगाचं लक्ष असलेल्या…